#MUMBAI : मास्कच्या किंमत निश्चितीच्या शासन निर्णय जाहीर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
25
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

मुंबई / शबनम न्युज

कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किंमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन – ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. आज याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

 

 

 

 

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करत आहे. शिवाय मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. त्यामुळे मास्कच्या किंमती सामान्यांना परवडणाऱ्या हव्यात यासाठी घेतलेल्या पुढाकाराला मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री यांनी मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
हॅण्ड सॅनिटायझर व मास्क यांच्या किंमतीत वाढ झाल्याने त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांना भोगावा लागत असल्याचे निदर्शनास आलेय. सॅनिटायझर व मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दर निश्चित करण्यापूर्वी उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

ही विक्री मूल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांना लागू राहील. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारित कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. या प्रकरणी काही तक्रार उद्भवल्यास, राज्यस्तरावर आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असतील, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील मास्कची आवश्यकता लक्षात घेता, उत्पादकाने राज्यात उत्पादित केलेला व राज्यात आवश्यक असलेला माल विहित दराने उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. रुग्ण सेवा देणारी महाराष्ट्रातील शासकीय व खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, कोवीड केअर सेंटर, कोवीड हॉस्पिटल्स इत्यादींना मास्कचा पुरवठा करताना मास्कच्या विहित अधिकतम विक्री मूल्य मर्यादेच्या ७० टक्के दराने उपलब्ध करून देणे आवश्यक राहील व खासगी रुग्णालयांनी उपरोक्त दराने मास्कची खरेदी केल्यानंतर खरेदी किंमतीच्या ११० टक्के पेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून आकारता येणार नाही असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मूल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे.